माझ्या वाढत्या वयात इंदिरा गांधी, भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व अभिमान होताच.
परंतु माझी त्यांच्याशी पहिली वैयक्तिक ओळख झाली ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या “लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर” या पुस्तकातून.
हे पुस्तक मला माझ्या वडिलांनी दिले होते. माझे बाबा, माझा आदर्श होते, आजही आहेत.
बाबा कामासाठी खूप प्रवास करायचे. आम्हाला त्यांची खूप आठवण यायची. त्यांच्या लांबच्या प्रवासात ते आई आणि आम्हाला सुंदर पत्रे लिहायचे. आम्हा मुलींना लिहिलेल्या पत्रांमध्ये ते आमच्या प्रत्येकीसाठी एक परिच्छेद लिहायचे. त्यात आमचे स्वभावविषेश आणी आम्ही स्वतःला कसे घडवू शकतो याबद्दल छोट्या छोट्या टिप्पण्या देत असत. यामुळे आम्हाला बाबांचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि अभिमान जाणवत असे.
“लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर“
यातील पंडितजींची पत्रे इतकी सोपी इंग्रजी आणि साध्या पद्धतीने लिहिली गेली होती की मला हे पुस्तक सहज समजले आणि खूप आवडले. त्यात ३० प्रकरणे होती, प्रत्येक प्रकरण त्यांची मुलगी इंदिरा यांना लिहिलेल्या पत्राच्या स्वरूपात आहे. यांत विश्वाच्या सुरुवातीपासून आणि पृथ्वीच्या निर्मितीपासून ते मानवी संस्कृतीच्या विकासापर्यंत, भारत आणि चीनमधील प्राचीन संस्कृती, आर्य आणि महान महाकाव्यांपर्यंतच्या विषयांचा समावेश आहे. त्यांनी जणू त्यांच्या मुलीला भारताचा इतिहास आणि त्याचा सांस्कृतिक वारसा सादर केला आहे.
त्यांनी संबोधलेल्या विषयांशी परिचित होण्याबरोबर, एका वडिलांचे आपल्या लाडक्या मुलीशी असलेले प्रेमळ नाते मला कळत गेले. त्यांचे कोमल नाते आणि एकमेकांशी संवाद साधण्याची मोकळीक खूपच आकर्षक होती.
लहानपणापासूनच त्यांचे हे नाते किती सुंदर असेल, की या पत्रांमधून त्यांचं त्यांच्या देशावर असलेले प्रेम, लोकांची सेवा करण्याची त्यांची समर्पण भावना आणि त्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करण्याची त्यांची वचनबद्धता, हे आपल्या लेकिकडे सर्वोत्तम वारसा म्हणून हस्तांतरित केले!!
आज मी स्वतःला एक अराजकीय व्यक्ती मानते! माझ्यासाठी राजकारण हा एक विचित्र खेळ आहे, ज्यामध्ये सत्ता सर्वोत्तम लोकांना भ्रष्ट बनवते!!
म्हणून मी येथे कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही.
मी फक्त लोकांसाठी समर्पित चार पिढ्या, आणि पुढील बनणार्या पाचव्या पिढी बद्दल मला वाटणारा आदर व्यक्त करते आहे!!
माझ्यासाठी जगात भारताचा सर्वोच्च आदर, अभिमान आणि सन्मान हा आपल्या स्वातंत्र्यवीरांनी, व स्वतंत्र भारताच्या नेत्यांनी निर्माण केला आहे.
इंदिराजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत, देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आलेली पहिली महिला, या नात्याने भारताला जागतिक स्तरावर शिखरावर नेऊन ठेवले 🙏🏼
त्यांची आठवण मला नेहमीच, मी भारतात जन्मलेली एक मुलगी, स्वाभिमान, सहिष्णुता, प्रेम आणि करुणेची जाणीव असलेली एक स्त्री व माता असल्याची जाणीव करुन देते🙏🏼
विशाखा ❤️ मिलींद


You must be logged in to post a comment.